वर्षभरापूर्वी नातेवाईकांच्या लग्न समारंभात ओळख झालेल्या शाळकरी मुलीशी प्रेमसंबंध जुळल्याने दोघांच्याही भेटीगाठी, बोलणे, चालणे वाढले. मात्र या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध वाढल्याने प्रेमी युगुलाने कुशीवली, पाली येथील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी समोर आली. यातील मुलगा आणि मुलीचा दोघांचाही मृत्यू झाला आहे.
रोशनी रविंद्र टबले ( 16 रा.टकली ,खरीवली ) व गणेश नकुल भोये ( 21 रा. मालबिडी ) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगूलाची नावे आहेत. या दोघांची वर्षभरापूर्वी नातेवाईकांच्या लग्न कार्यात ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ते दोघेही एकमेकांना भेटत होते. रोशनी अंबीस्ते हायस्कुलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती तर गणेश हा वडपे येथे गोदामात काम करीत होता. या प्रेमाची कुणकूण रोशनी हिच्या आईवडिलांना लागताच त्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे निराश झालेल्या या दोघांनी शनिवारी दुपारी घर सोडले होते.
शाळेत गेलेली मुलगी घरात उशिरापर्यंत परतली नाही. त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी थेट मुलीचा प्रियकर गणेश याचे घर गाठले आणि त्याच्या आईवडिलांना आमची मुलगी रोशनी दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यावेळी गणेशच्या आईवडिलांनीही आमचा मुलगा घरात नाही असे सांगण्यात आले. गणेश रोशनीला मोटार सायकलवरून पाली येथील काकाकडे घेऊन गेला. मात्र काकाच्या घरी कोणी नव्हते. त्यावेळी त्याने मोटार सायकल घरासमोर उभी करून ते दोघेही जंगलात गेले आणि आत्महत्या केली. या आत्महत्येची नोंद पडघा पोलीस ठाण्यात झाली आहे.