लोकल प्रवासाला राज्य सरकार कधी परवानगी देतेय याची मुंबईकर वाट बघत होते. पण आता १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र प्रवास करण्यासाठी एक अट राज्य सरकारकडून घालण्यात आली आहे ती म्हणजे कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस त्या म्हणाल्या की, ६५ स्थानकांवर रेल्वेचा पास, क्युआर कोड, तिकीट मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत मुंबई महापालिका लोकल पाससाठी App तयार करणार आहे.
किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि रेल्वे मिळून Action प्लॅन करत आहेत. ६५ स्थानकांवर क्युआर कोड, पास, तिकिट मिळणार असून येत्या दोन दिवसांत App निर्मिती केली जाईल. दरम्यान ३२ लाख प्रवाशांसाठी आराखडा केला आहे. महत्वाचे म्हणजे दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवास मिळणार आहे. अन्यथा मिळणार नाही.
‘लोकल पास, क्युआर कोड, तिकीट घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या तरी हरकत आहे. पण त्यादरम्यान स्वतःची काळजी घ्या, डबल मास्क वापरा. दोन डोस घेतले तरी मास्क लावायचाच आहे. तो काढून चालणार नाही. व्यवहार चालू ठेवण्यासाठी काळजी घेऊयात, ‘अशा महापौर म्हणाल्या.
पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘म्यानमारमध्ये खूप मोठ्याप्रमाणात रुग्णांची संख्येने वाढतेय. पण मुंबईत जिथे जिथे अडचण आहे, तिथे तिथे महानगर पालिकेचे वॉर्ड आहेतच. तेही तुमच्या माहितीसाठी सज्ज आहेत. मुंबईत १९ लाख नागरिकांना दोन्ही डोस दिलेले आहेत. ठाणे, वसई, विरार, कल्याण, मिरा-भाईंदर येथील असे एकूण ३२ लाख प्रवाशी आहेत. मागील आढाव्यानुसार दररोजच्या प्रवासांची संख्या ८० लाख आहे.’