भरधाव धावणार्या गाड्या आणि ओव्हरटेक करणारी वाहने, रास्ता ओलांडणारे पादचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उपवन तलावाच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग पट्टा नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच रात्रीच्या वेळी वाहनचालकांना गतिरोधक दिसत नसल्याने वेगात असलेल्या वाहनांना अपघात होत आहेत.
या भागात मागील काही वर्षात अपघाताचे प्रमाण वाढतच असून वाहतूक विभागाच्या ढिसाळ कारभारामुळेही अपघात होत आहेत. उपवन परिसरात बनवण्यात आलेल्या गतिरोधकावर झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या रंगवण्यात न आल्याने विचित्र अपघात होत आहेत. याबाबत वारंवार वाहतूक विभागाला पत्र व्यवहार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्थानिक नागरिक हेमंत महाले यांनी सांगितले.
ठाणे येथील लोकप्रिय असलेला उपवन तलाव परिसरात ठेकेदाराने रस्ता तयार करून आज 6-7 महिने झाले आहेत. याच परिसरात कोकणीपाडा पोखरण 2 येथील नागरिक आणि ठा. म. पा. शाळा क्र. 48 चे विद्यार्थी रोज रस्ता ओलांडतात. या रस्त्यावर अपघात झाल्यानंतर याची जबाबदारी कोण घेईल ? असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. याबाबत लवकरात लवकर वाहतूक विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधला असता ठाणे महापालिकेला याबाबत कळवण्यात येणार असून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.