“आरेमध्ये होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी २ हजार ७०० झाडे तोडण्याच्या शिवसेना भाजप सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईकर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि म्हणूनच ही कारशेड बनवण्याच्या विरोधात मुंबईकर जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. आरेतील झाडांचा विनाश करणे म्हणजे मुंबईचा विनाश करण्यासारखे आहे. वृक्षसंपदेतील झाडांचा विनाश करणे म्हणजे मुंबईकरांचा श्वास रोखण्यासारखे आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड बांधणे हा या षडयंत्राचा एक भाग आहे. आरेमधील जंगल तोडून यामध्ये काँक्रीटचे जंगल उभे करण्याचा हा सरकारचा डाव आहे,” असा घणाघाती आरोप मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
हेही वाचा – राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषण सिंह होळकर यांचा भाजपात प्रवेश
आदिवासी बांधवांची हजेरी
महाराष्ट्र सरकारने मेट्रो कारशेडसाठी आरे मधील २ हजार ७०० झाडे तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे आज क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक, पिकनिक पॉईंट आरे, गोरेगाव पूर्व येथे मेट्रो कारशेड हटवा या मागणीकरिता चिपको आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी या विभागातील आदिवासी बांधव आणि मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.