मुंबई : शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळस असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे कोणत्याच खात्यात अधिककाळ टिकू शकले नाहीत. अधिकारी-कर्मचारी वर्गात त्यांचा कायम दरारा राहिला आहे. बहुतांश मंत्र्यांच्या डोळ्यात ते खूपत असल्याची चर्चा आहे. म्हणून तर त्यांची कोणत्या ना कोणत्या कारणाने बदली केली जाते. नुकतीच त्यांची आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदावरुन बदली करण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी त्यांचे खटके उडाले होते, असे बोलले जाते. अचानक त्यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र या बदलीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे आरोग्य मंत्री सावंत यांनी सांगितले.
सध्या तुकराम मुंढे यांच्याकडे कोणताच पदभार नाही. मुंढे यांनी सूचक ट्विट केले. आयुष्यात नेहमीच तुमच्या अपेक्षेप्रमाणे, त्या मार्गाने घटना घडत नसतात, असे मुंढे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधून मुंढे यांना नेमकं काय म्हणायचं आहे, यावर तर्क वितर्क सुरु आहेत. त्याची चर्चाही सुरु आहे.
Life Doesn’t Always play out
The Way You Expect..,
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) December 4, 2022
आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अधिकारी- कर्मचारी वर्गाला शिस्त लावण्याचे काम मुंढे यांनी सुरु केले. कोरोना काळातील औषध खरेदीचा अहवाल मुंढे यांनी मागवला होता. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुंढे यांची तक्रार केल्याचे समजते. महत्त्वाचे म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारनेच मुंढे यांना सप्टेंबर महिन्यात या पदावर आणले होते. नोव्हेंबर महिन्यात त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
याआधीही वेगवेगळ्या विभागातून अचानक मुंढे यांची बदली करण्यात आली. कोरोना काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयावर अधिकारी-कर्मचारी वर्ग नाराज होता. शिस्त न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडका त्यांनी लावला होता. मात्र त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचे कौतुकही विविध स्तरातून झाले. सरकारी प्रणालीवर अंकुश ठेवणारा अधिकारी असायलाच हवा, अशीही मागणी सामान्य नागरिकांकडून होत असते. त्यामुळेच मुंढे यांच्या ट्विटवर चर्चा सुरु झाली आहे.