गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहेत. सतत पडणाऱ्या या पावसाचा फटका मात्र सामान्यांच्या खिशाला बसला आहे. यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली असून भाज्यांचे भाव कडाडले आहेत. यामुळे मुंबईत काही ठिकाणी कांदा ६० ते ७० रूपयांच्या घरात गेला आहे. तर इतर भाज्यांचे भाव देखील ८० रूपये किलो या दरात जात आहे.
हेही वाचा- राज्याला परतीचा पाऊस झोडपणार; हवामान खात्याचा इशारा
मुंबईमध्ये साधारण भाज्यांचा पुरवठा हा नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होतो तर, याच बाजार समितीतून नाशिक, नगर तसेच ठाणे जिल्ह्याच्या काही भागातून भाज्यांची आवक होत असते मात्र, पावसाचा जोर अधिक वाढल्याने भाज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाज्यांच्या होणाऱ्या आवकवर त्याचा परिणाम झाला आहे. याकारणानेच भाज्याचे भाव वाढले आहेत.
नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबईत भाजी आणण्याचा खर्च किलोमागे ६ ते ८ रुपये असल्याने भाज्यांचे घाऊक दर दररोज ६ ते ८ रुपयांनी वाढल्यास किरकोळ बाजारात ही वाढ १२ ते १४ रुपये होते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सर्वच भाज्या किरकोळ बाजारात १०० रुपये किलोवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.