२००६ सोहराबुद्दीन, तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी मुख्य साक्षीदार असलेल्या ४० वर्षीय व्यक्तीने त्याच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. येणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे आपल्याला न्यायालयात साक्ष देण्यास जमत नसल्याचे त्यांनी पत्राद्वारे न्यायालयाला कळविले आहे. या साक्षीदाराने हे पत्र त्याच्या पत्नीमार्फत न्यायालयात पाठवले असून त्यामध्ये काही गोष्टींचा खुलासा साक्षीदाराने केला आहे. मे २०१२ पासून सोहराबुद्दीन आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुरु होती. या प्रकरणात अमित शहा यांच्यासह एकूण ३८ आरोपी आहेत.
पत्रातील मजकूर
आपण सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुख्य साक्षीदार असून या संदर्भात बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याकडे असल्याचे हा व्यक्ती सांगत आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्यावर कोर्टात साक्ष न देण्यासाठी राजकारणी आणि पोलीस दबाव टाकत असून राजस्थान पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात ५ गुन्ह्यांमध्ये आपल्याला नाहक गोवल्याचे त्याने या पत्रात नमूद केले आहे. हा सर्व प्रकार केवळ मी कोर्टात साक्ष देऊ नये, यासाठी केले जात असल्याचेही त्यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.
सोहराबुद्दीनचा जवळचा मित्र
यापूर्वी सीबीआयने या साक्षीदाराविषयी साक्ष देताना म्हटले होते की, या व्यक्तीवर राजस्थानातील वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना त्याचा शोध घेणे कठीण झाले आहे. व्यक्ती सोहराबुद्दीन शेख यांचा जवळचा मित्र होता. तसेच उदयपूर कारागृहात एकाच बराकीत तुलसीराम प्रजापती यांच्या सोबत होता. सोहराबुद्दीन प्रकरणी आतापर्यंत ३ साक्षीदारांची साक्ष झाली असून यात २ जण अहमदाबाद रेल्वेस्थानकावरील बुकिंग विंडो कर्मचारी असून यांनीच चार पोलीस आणि तुलसीराम प्रजापती यांना रेल्वेचे तिकीट दिले होते. जे त्यांनी न्यायालयात ओळखले आहे.
भाजपाध्यक्षांना कोर्टाकडून दिलासा
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मुंबई सीबीआय स्पेशल न्यायालयाने सोहराबुद्दीन आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी अमित शहा यांच्या विरोधातील सर्व गुन्हे न्यायलायाने रद्द केले असून सीबीआयने केलेल्या चौकशीत अमित शहा यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे कोर्टाने सांगत अमित शहांना दिलासा दिला आहे. फोन कॉल डिटेल्सवरून अमित शहा यांचा थेट बनावट चकमकीत संबंध असल्याचे स्पष्ट होत नाही. फक्त आरोप केल्याने अमित शहा यांना आरोपी बनवता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या कारणांच्या आधारे न्यायलायाने अमित शहा यांचा अर्ज मान्य केला होता.
सीबीआय गंभीर नाही
सीबीआय केंद्र सरकारचा बोलतां पोपट आहे. अमित शहा यांना दिलासा मिळावा या करता सीबीआयने मुद्दाम या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत न्यायालयाच्या या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सोहराबुद्दीनचा भाऊ रूबाबुद्दीन याने सांगितले आहे.
काय आहे हे प्रकरण
मे २०१२ पासून सोहराबुद्दीन आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुरु होती. यावेळी आपला या प्रकरणीशी संबंध नाही. हे आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र आहे, असा अर्ज अमित शहा यांनी केला होता. या प्रकरणात अमित शहा यांच्यासह एकूण ३८ आरोपी आहेत. यात गुजरात पोलीस, गुजरात एटीएस आणि अन्य आरोपी होते.