नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष राहिलेल्या महेश जाधव यांनी वाशी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश जाधव यांचे स्वागत केले आहे. आगामी काळात महेश जाधव यांना मोठी जबाबदारी देण्याचे संकेत पक्षश्रेष्ठंनी दिले आहेत. (NCP Mahesh Jadhav in NCP Ajit Pawar criticizes MNS citing Namak Haram movie)
हेही वाचा – Rajni Satav : काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे निधन; 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
महेश जाधव यांनी 9 जानेवारी रोजी अमित ठाकरे आणि इतरांवर गंभीर आरोप केले होते. तोंडातून रक्त निघालेले असताना महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत त्यांना मारहाण झाली असल्याचा दावा केला होता. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्यातील फोनद्वारे झालेल्या संभाषणाची एक तथाकथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महेश जाधव यांची महाकालपट्टी केली होती.
आता महेश जाधव राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. यावेळी अजित पवार यांनी ‘नमक हराम’ या चित्रपटाचा दाखला देऊन, त्यातही असेच झाले असल्याचे सांगितले. तसेच “महेश जाधव हा गोदी कामगाराचा सुपूत्र असल्यामुळे कुठल्याही कामगारावर अन्याय होऊ द्यायचा नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, असे सांगत महेश जाधव यांना अधिकृतपणे राष्ट्रवादीत घेतल्याचे जाहीर केले.
हेही वाचा – Baramati : हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून इशारा; अजित पवार-पाटील संघर्ष पेटणार?
अल्पसंख्याक समाजासाठी 1500 कोटी रुपये देण्याचा मानस
दरम्यान, या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आर्थिक कारणांमुळे अल्पसंख्याक समाजामध्ये अनेक मुली उच्च शिक्षण करत नाही. पण शासनाने आता निर्णय घेतला असून आठ लाखांच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे. विशेष म्हणजे याचा लाभ सर्वच जाती धर्मातील मुलींना मिळणार आहे. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गतवर्षी शासनाने 500 कोटी दिले होते. या वर्षी 1500 कोटी रुपये देण्याचा मानस आहे. नांदेड, मालेगाव, छत्रपती संभाजी नगर, मुंबई येथे उर्दु हाऊस सुरू करण्याचा मानस असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.