वसईः लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या वसई– विरार महापालिका हद्दीतील उद्यानांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने दयनिय अवस्था झाली आहे. उद्यानातील खेळणी आणि व्यायामाचे साहित्य तुटलेले आहे. विरारमधील मनवेलपाडा येथील उद्यानाचीही अशीच दुरवस्था झाली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर उद्यानाची दुरुस्ती करून नवी खेळणी आणि व्यायामाचे साहित्य बसवण्यात आले आहे. वसई–विरार महापालिकेच्या बहुतांश उद्यानांची देखभाल–दुरुस्ती होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सततच्या तक्रारीनंतरही उद्यांनांतील खेळण्यांची आणि वृक्षरोपांची देखभाल होत नसल्याने नागरिकांनी महापालिकेविरोधात नाराजी व्यक्त केलेली होती. महापालिकेच्या निष्काळजीमुळे मनवेलपाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर परिक्रमा नौकाविहार उद्यानाचीही आत्यंतिक दुरवस्था झालेली होती. उद्यानांतील लहान मुलांची खेळणी आणि ज्येष्ठ महिला आणि पुरुषांच्या असलेली व्यायामाची साधने तुटलेल्या–मोडलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अपघात होण्याची शक्यता होती.
विशेष म्हणजे महापालिकेच्या नऊही प्रभागांतील उद्यानांत विविध प्रकारची खेळणी आणि फिटनेस साहित्य बसवण्याचा निर्णय २०२० मध्ये घेण्यात आला होता. यावर तब्बल १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. त्यामुळे या उद्यानांत नवीन खेळणी आणि फिटनेस साहित्य बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. याशिवाय माजी नगरसेवकांकडूनही या उद्यानांत खेळणी आणि फिटनेस साहित्य बसवण्याची मागणी होत होती. त्यामुळे महापालिकेने या उद्यानांत खेळणी आणि फिटनेस साहित्य बसवण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी महापालिकेला खेळणी व साहित्य बसवण्याकरता मुहूर्त सापडत नव्हता.
‘गार्डन सिटी म्हणून लौकिक प्राप्त करून देण्याचा संकल्प
वसई–विरार महापालिकेच्या नऊही प्रभागांत एकूण १५२ उद्याने आहेत. या उद्यानांपैकी १२८ उद्यानांच्या देखभाल–दुरुस्तीकरता महिला बचत गटांची नेमणूक करण्यात आलेली आहे. चार उद्यानांची देखभाल ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी २०२३–२४ च्या अर्थसंकल्पात वसई–विरार शहराला ‘गार्डन सिटी म्हणून लौकिक प्राप्त करून देण्याचा संकल्प सोडलेला होता. या संकल्पाची पूर्ती होण्यास एक वर्षाचा अवधी लागला आहे. आगामी २०२४–२५ च्या अर्थसंकल्पाआधी महापालिकेच्या बहुतांश उद्यानांचे काम हाती घेऊन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ही संकल्पपूर्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे.