भाईंदर :- मीरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला रात्रीच्या वेळी चोरीने ट्रक चालक मोठ्या प्रमाणात माती व कचरा , डेब्रिज भराव टाकत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून त्याचा नागरिकांना त्रास देखील होत आहे. ट्रक चालक रात्रीच्या वेळेस कचरा टाकत असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत नाही. त्यामुळे या ट्रक चालकांवर कारवाई करण्यासाठी मीरा- भाईंदरच्या हद्दीत असलेल्या मुंबई- अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मीरा- भाईंदर शहरात मुंबई आणि इतर ठिकाणावरून इमारतीचे निघालेले डेब्रिज, माती, कचरा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला व कांदळवनात आणून टाकला जातो. शहराची स्वच्छता बिघडवणार्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षी पथक नेमले होते.
परंतु या पथकाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने हे पथक बंद करण्यात आले आहे. मुंबईतून येणारे मातीने भरलेले ट्रक दहिसर चेकनाका येथे अडवून त्यांची तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु पोलीस व महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शहरात माती भरावाचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील दहिसर चेकनाक्यापासून ते पुढे घोडबंदर पुलापर्यंत मीरा-भाईंदर महापालिकेची हद्द आहे. या महामार्गांच्या कडेला मोठ्या प्रमाणात बाहेरील माती, डेब्रिज व कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे येथून प्रवास करणार्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच रात्रीच्या अंधारात टाकलेली माती दिसत नसल्यामुळे वाहन चालकांचे अपघात होत असल्याचे दिसून येते. अनेक वेळा तक्रारी करून देखील याकडे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरात लवकर महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश विभाग प्रमुखांना दिले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर यांनी दिली आहे.