गेल्या काही महिन्यात राजकारणी हे महापुरुषांच्याबाबत काहीही बरळू लागले आहेत. ज्यामुळे राजकीय वातावरण तर तापतच आहे, पण यामुळे महापुरुषांची मात्र होणारी अवहेलना काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचेच दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राहुल गांधी यांच्याविरोधात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपकडून आंदोलन करण्यात आले.
तर दोन दिवसांपूर्वी कालीचरण महाराज याने महात्मा गांधी यांच्याबाबत गरळ ओकली, ज्यामुळे आणखी एका वादाला नव्याने सुरूवात झाली आहे. या सर्व घडामोडींवर राज्यातील आक्रमक पक्ष म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील नेत्यांनी कसे काय मत व्यक्त केले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आता याबाबत मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये त्यांनी पु. ल. देशपांडे यांचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
व्हिडीओ पोस्ट करताना लिहिण्यात आले आहे की, “सध्या उठसूठ महापुरुषांची बदनामी करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. कधी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना तर कधी फुले, गांधी, टिळक, आंबेडकर, सावरकर, नेहरू ह्या महापुरुषांवर चिखलफेक. उथळ बोलणाऱ्या ह्या वाचाळवीरांना ऐकलं कि आठवतो तो पु.लं.च्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधला ‘अंतू बर्वा’… त्यात ‘अंतू बर्वा’ त्यांच्या गावच्या कट्ट्यावर गावकऱ्यांशी चर्चा करताना म्हणतो “स्वराज्याचा संबंध गांधींशी नाही, टिळकांशी नाही नि सावरकरांशी नाही… इंग्रज देश सोडून गेला तो कंटाळून…” अंतूशेठचे असे गमतीशीर टिपण्या ऐकून पु. लं. देशपांडे एक छान वाक्य लिहितात… “ह्यांची नेमकी आदराची स्थानं तरी कोणती?”
“…आजचे हे विनाकारण उकरून काढलेले वाद आणि त्यातून होणारी महापुरुषांची मानहानी उद्याची पिढी जेव्हा वाचेल किंवा पाहील तेव्हा तेही हेच म्हणतील “आपली नेमकी आदराची स्थानं तरी कोणती?”… वाचाळवीरांच्या इवल्याश्या बुद्धीवर निर्भर राहू नका. आपले महापुरुष संपूर्ण समजून-उमजून घ्या… अपुऱ्या आणि उथळ माहितीवर मतं बनवाल तर एका महाकाय सापळ्यात तुमची शिकार होईल! (विशेष सूचना : विवेकबुद्धी आणि विनोदबुद्धी नसणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहूच नये !)”
सध्या उठसूठ महापुरुषांची बदनामी करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. कधी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना तर कधी फुले, गांधी, टिळक, आंबेडकर, सावरकर, नेहरू ह्या महापुरुषांवर चिखलफेक. उथळ बोलणाऱ्या ह्या वाचाळवीरांना ऐकलं कि आठवतो तो पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली'मधला 'अंतू बर्वा'…… pic.twitter.com/Ta6txZNsiW
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 2, 2023
सध्या राज्यात महापुरुषांच्याबाबत कोणीही येऊन काहीही बरळताना दिसून येत आहे. ज्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण काही राजकीय नेते हे बोलताना त्यांच्या सद्दसद विवेकबुद्धीचा वापर करून बोलत नसल्याने महापुरुषांच्याबाबत अपमानकारक वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – ठाकरे गटाला लागलेली गळती थांबेना, एका प्रमुख व्यक्तीचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’