मंचर (पुणे) : विरोधक महागद्दार आहेत हे माहिती होतं, पण विरोध करण्याचा बालिशपणा करत भेकडपणा करतील हे माहिती नव्हतं, अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर शहरात पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, सुरेश भोर, राजाराम बाणखेले, राजू इनामदार, आलू इनामदार, बाळासाहेब बाणखेले, दत्ता गांजाळे उपस्थित होते. (MP Amol Kolhe challenged opponents Shivajirao Adhalra) या पदयात्रेदरम्यान, विरोधकांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली. या कृत्याला बालिशपणा म्हणत डॉ. कोल्हे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
घर कोणाचं, संसार कोणाचा आणि दारावर पाटी कोणाची?
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, मंचर शहराला स्वर्गीय किसनराव बाणखेले यांच्या विचारांचा वारसा आहे, त्या शहरात विरोध करण्याचा पोरकट आणि बालिशपणा करण्यात आला. हे गद्दार आहेत, हे माहिती होतं. हे इतके भेकड आहेत हे माहीत नव्हतं. स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा आणि एकदा होऊनच जाऊ द्या, असं जाहीर आव्हान अमोल कोल्हेंनी विरोधकांना दिलं.
कोविड काळात पाच लाख नागरिकांचे लसीकरण
कोविड काळात खासदार कुठं होते असं विचारणाऱ्या विरोधकांच खरचं हसू येत, असं सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरूर तालुक्यातील पाच लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करून घेणारा अमोल कोल्हे हा देशातील पहिला खासदार होता. इतकच नव्हे तर फॅबी फ्ल्यु या 105 रुपयांच्या गोळीची किंमत चाळीस रुपयांनी कमी करणाराही खासदार अमोल कोल्हेच होता.
हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : शिरुरमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; आढळरावांनी पराभव मान्य केलाय – अमोल कोल्हे
अमोल कोल्हेंच्या पदयात्रेत हुटिंग
अमोल कोल्हे यांच्या पदयात्रे दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या हुटिंगला प्रत्युत्तर देताना खासदार कोल्हे म्हणाले की, घोषणा जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने दिल्या जात असतील, तर मग उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं, त्या पंतप्रधानांच्या हाताखाली काम करणाऱ्या सरकारने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यात बंदी लादली होती, तेव्हा तुमचं तोंड का शिवलं होतं? जेव्हा दुधाचे भाव दहा ते बारा रुपयांनी पडले तेव्हा तुमचं तोंड का शिवलं होतं? बिबटप्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फ्रेज लाईट का दिली जात नाही हे विचारताना तुमचं तोंड का शिवलं होतं? असे सवाल कोल्हेंनी शिवाजी अढळराव यांना केले. Edited by – Unmesh Khandale