टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली असून, सुरूवातीपासूनच या स्पर्धेत रंगत पाहायला मिळत आहे. मात्र, या स्पर्धेवर पावसाचे सावट असल्याने खेळाडू आणि चाहत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सराव सामना होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे भारतीय संघ आता थेट रविवारी पाकिस्ताशी लढणार आहे. परंतू, टी-20 विश्वचषकाच्या सामन्यावेळी पाऊस पडल्यास आयसीसीचा नियम काय सांगतो, जाणून घेऊयात… (icc rules rain interrupts in t20 world cup 2022 matches)
आयसीसीच्या नव्या नियमांनुसार, साखळी फेरीतील सामन्यात जर पाऊस पडला आणि तो होऊ शकला नाही तर पॉइंट सिस्टमनुसार, स्पर्धेतील एका सामन्यातील विजयाला 2 गुण मिळतील, तर पराभवाला शून्य गुण मिळतील. जर सामना टाय झाला, रद्द झाला किंवा सामन्याचा निकाल लागला नाही, तर दोन्ही संघांमध्ये 1 गुण विभागला जाईल.
याशिवाय, पात्रता आणि सुपर-12 फेरीसाठी कोणताही राखीव दिवस नसेल, म्हणजे सामना रद्द झाल्यास तो पुन्हा खेळवण्यात येणार नाही. त्यामुळे पावसामुळे साखळी फेरीत एखाद्या मोठ्या संघाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सामना सुरु होण्यापूर्वी जर पाऊस पडला आणि पाच षटकेही टाकण्याची परिस्थिती नसेल तर राखीव दिवस वापरला जाईल. जर सामना वेळेवर सुरू झाला आणि मध्येच पाऊस आला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही, तर राखीव दिवशी सामना जिथे थांबवला जाईल तिथून पुढे जाईल. पण यावेळी फक्त प्ले ऑफच्या सामन्यांसाठीच हे राखीव दिवस असतील. आयसीसीने स्पर्धेसाठी वेगवेगळे नियम केले आहेत, त्यानुसार सामने खेळवले जातील.
हेही वाचा – ‘या’ कारणामुळे हरमनप्रीत कौरची महिला बिग बॅश लीगमधून माघार