भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय फलंदाजांना मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स यासारख्या भेदक गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या उसळी घेणाऱ्या आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांना या दौऱ्यात चांगले प्रदर्शन करण्यासाठी झुंज द्यावी लागणार आहे. मात्र, यासाठी आपण तयार असल्याचे विधान भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने केले आहे.
आम्हाला खेळपट्ट्या आणि परिस्थितीचा अनुभव
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करण्याविषयी रोहित म्हणाला, “प्रत्येक ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारताचे सामने ब्रिस्बन आणि पर्थ येथे होतातच. या दोन ठिकाणी चेंडू जास्त उसळी घेतो. त्यातच ऑस्ट्रेलियाकडे उंच गोलंदाज असल्याने ते या खेळपट्टयांचा चांगला वापर करतात. भारताचे फलंदाज हे फार उंच नाहीत. त्यामुळे हे उसळी घेणारे चेंडू खेळताना आम्हाला त्रास होऊ शकतो. पण आम्ही या आव्हानसाठी तयार आहोत. आमचे बरेचसे खेळाडू याआधी ऑस्ट्रेलियामध्ये खेळले आहेत. त्यामुळे त्यांना या खेळपट्ट्या आणि परिस्थितीचा अनुभव आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल.”
मुंबईमध्ये सिमेंटच्या खेळपट्टयांवर खेळून मोठा झाला
रोहितने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये ५७.५० च्या सरासरीने ८०५ धावा केल्या आहेत. त्याबाबत तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियात मी याआधी चांगले प्रदर्शन केले आहे. याचे कारण मी मुंबईमध्ये सिमेंटच्या खेळपट्टयांवर खेळून लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर मला फलंदाजी करताना मदत मिळते.”