भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरूवात होणार आहे. पहिला सामना २६ डिसेंबरला होणार आहे. मात्र पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताचे काही खेळाडू दुखापतीच्या कारणास्तव मालिकेच्या अगोदरच संघाबाहेर गेले होते. दरम्यान आता कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा देखील कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येला दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. भारतीय संघाच्या याच अडचणीवरून माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्राने महत्त्वाचे विधान केले आहे. त्याने म्हंटले की, जर भारतीय संघाचे एवढे खेळाडू दुखापतग्रस्त असतील तर दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला पाहिजे का?.
आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनेलवर सांगितले की, “रवींद्र जडेजा, राहुल चाहर, शुभमन गिल, अक्षर पटेल आधीपासूनच संघात नाहीत. आता रोहित शर्मा देखील नसणार आहे. हे काय चालू आहे, आता काय दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करायला हवा की काय.”
दरम्यान, माजी क्रिकेटरने आफ्रिका दौऱ्याबाबत म्हंटले की, “अद्याप हेदेखील स्पष्ट नाही की संघाचा उपकर्णधार कोण असेल, असेल किंवा नसेलही.” आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार रोहित शर्मा भारतीय संघातून बाहेर जाणे म्हणजे संघाला एक मोठा झटका आहे. कारण मागील एक वर्षात भारतीय कसोटी संघासाठी रोहित शर्मा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे रोहित शर्माला मुंबईत सराव करताना दुखापत झाली होती. फलंदाजी करत असताना रोहितला चेंडू लागला होता, त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आगामी तीन कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे. रोहित शर्माच्या जागेवर युवा खेळाडू प्रियांक पांचालला संधी मिळाली आहे.