भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर तीन विकेट राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २७५ धावांची मजल मारली होती. याचा पाठलाग करताना भारताची ७ बाद १९३ अशी अवस्था होती. परंतु, आठव्या क्रमांकावरील दीपक चहरने उत्कृष्ट फलंदाजी करत ८२ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ६९ धावांची खेळी केल्याने भारताला रोमहर्षक विजय मिळवण्यात यश आले. कोणालाही अपेक्षा नसताना हा विजय मिळवल्याने भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने ड्रेसिंग रूममध्ये जाताच खेळाडूंचे कौतुक केले.
चॅम्पियन संघाप्रमाणे प्रत्युत्तर दिले
आपल्याला विजय मिळवण्यात यश आले हे उत्तमच झाले. मात्र, निकाल आपल्या बाजूने लागला नसता तरीसुद्धा मी तुमचे कौतुक केले असते. तुम्ही शेवटपर्यंत झुंज देत राहिलात. त्यामुळे तुम्हा सर्वांचे अभिनंदन. ते (श्रीलंका) पुनरागमन करतील हे आपल्याला अपेक्षित होते. आपण प्रतिस्पर्धी संघाचा आदर केलाच पाहिजे. तोसुद्धा आंतरराष्ट्रीय संघ आहे. त्यांनी पुनरागमन केले, पण त्यांना आपण एका चॅम्पियन संघाप्रमाणे प्रत्युत्तर दिले. अडचणीत सापडल्यानंतरही आपण त्यातून मार्ग काढला. त्यामुळे तुम्हा सर्वांचे कौतुक, असे म्हणत द्रविडने खेळाडूंना शाबासकी दिली.
From raw emotions to Rahul Dravid’s stirring dressing room speech 🗣️🗣️@28anand & @ameyatilak go behind the scenes to get you reactions from #TeamIndia‘s 🇮🇳 thrilling win over Sri Lanka in Colombo 🔥 👌 #SLvIND
DO NOT MISS THIS!
Full video 🎥 👇https://t.co/j2NjZwZLkk pic.twitter.com/iQMPOudAmw
— BCCI (@BCCI) July 21, 2021
एका खेळाडूला श्रेय देणे योग्य नाही
२७६ धावांचा पाठलाग करताना भारताची ७ बाद १९३ अशी अवस्था होती. मात्र, दीपक चहरने आपले एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. तसेच त्याने भुवनेश्वर कुमारच्या (नाबाद १९) साथीने ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचल्याने भारताने पाच चेंडू शिल्लक असतानाच हा सामना जिंकला. भारताच्या या विजयात सूर्यकुमार यादवची (५३) भूमिकाही महत्त्वाची ठरली. त्यामुळे विजयाचे श्रेय कोणत्याही एका खेळाडूला देणे योग्य ठरणार नाही, असे द्रविड म्हणाला.