दीपक चहरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ३ विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २७५ धावांची मजल मारली होती. याचा पाठलाग करताना भारताची ७ बाद १९३ अशी अवस्था होती. परंतु, दीपक चहरने उत्कृष्ट फलंदाजी करत ८२ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ६९ धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठरले. तसेच त्याने भुवनेश्वर कुमारच्या (नाबाद १९) साथीने ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचल्याने भारताने पाच चेंडू राखून हा सामना जिंकला. भारताच्या या विजयात सूर्यकुमार यादवची (५३) भूमिकाही महत्त्वाची ठरली.
India win and gain an unassailable 2-0 series lead 💪
Deepak Chahar’s heroics with the bat seal a three-wicket victory for the visitors!#SLvIND | https://t.co/mazzKoaauY pic.twitter.com/Q7fQA1Dqch
— ICC (@ICC) July 20, 2021
चहल-भुवनेश्वरच्या ३-३ विकेट
त्याआधी या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसून शानकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर अविष्का फर्नांडो (५०) आणि मिनोद भानुका (३६) यांनी श्रीलंकेच्या डावाची चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर श्रीलंकेने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. परंतु, चरीथ असालंका (६५) आणि चमिका करुणरत्ने (नाबाद ४४) यांच्या आक्रमक खेळींमुळे श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद २७५ अशी धावसंख्या उभारता आली. भारताकडून युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. तर दीपक चहरला २ विकेट घेण्यात यश आले.