भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बनमध्येच व्हावा यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील आहे. परंतु, भारतीय संघ हा सामना ब्रिस्बनमध्ये खेळण्यास फारसा उत्सुक नाही. ‘१५ जानेवारीपासून सुरु होणार हा सामना ठरल्याप्रमाणे व्हावा असे वाटत असल्यास ब्रिस्बनमधील क्वारंटाईनचे नियम भारतीय खेळाडूंसाठी शिथिल करा,’ अशी मागणी करणारे पत्र बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला गुरुवारी लिहिले होते. त्यातच शुक्रवारी ब्रिस्बनमध्ये तीन दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने आता चौथ्या कसोटीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
ब्रिस्बनमध्ये होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्याला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या लॉकडाऊनचा या सामन्यावर परिणाम होऊ शकेल का? याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अधिकारी आढावा घेत आहेत. ब्रिस्बनमध्ये जैव-सुरक्षित वातावरणाचे नियम इतर ठिकाणांपेक्षा अधिक कडक आहेत. त्यामुळे भारतीय संघ ब्रिस्बनमध्ये येऊन कसोटी सामना खेळण्यास फार उत्सुक नव्हता. आता ब्रिस्बन येथे तीन दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आल्याने चौथ्या कसोटीबाबत प्रश्नचिन्ह आहेत, अशी माहिती सिडनी मॉर्निंग हेराल्ड या ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्राने दिली.
त्याआधी गुरुवारी बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्र लिहिले होते. ब्रिस्बनमधील क्वारंटाईनच्या नियमांनुसार, खेळाडूंना दिवसाचा खेळ संपल्यावर थेट त्यांच्या हॉटेल रूममध्ये जावे लागेल. त्यांना तेथून बाहेर पडता येणार नाही. मात्र, क्वारंटाईनचे हे कडक नियम बीसीसीआयला मान्य नाहीत. आयपीएल स्पर्धेदरम्यान खेळाडूंना एकमेकांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारण्याची, जेवायची परवानगी होती. आता अशीच परवानगी खेळाडूंना ब्रिस्बनमध्ये मिळावी अशी बीसीसीआयची मागणी आहे.