पहिला टी-२० सामना गमावल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दमदार पुनरागमन केले. भारताने दुसरा सामना ७ विकेट राखून जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून तिसरा सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचे सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल. दुसऱ्या टी-२० सामन्यातील भारताच्या विजयात ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर आणि रिषभ पंत या नव्या दमाच्या खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांचाही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल.
राहुलच्या कामगिरीची चिंता
भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत आक्रमक शैलीत खेळणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीने सांगितले होते. कर्णधाराने सांगितल्याप्रमाणे भारताच्या खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यात आक्रमक खेळ केला. या सामन्यात २२ वर्षीय डावखुरा फलंदाज ईशान किशनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने अवघ्या ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्याला कर्णधार कोहलीची (नाबाद ७३) उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताला हा सामना सहजपणे जिंकण्यात यश आले. मात्र, भारतासाठी सलामीवीर लोकेश राहुलचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. राहुल पहिल्या दोन सामन्यांत (१ आणि ०) अपयशी ठरला. त्यातच या किंवा पुढील सामन्यात रोहित शर्माचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता असल्याने राहुलवर धावा करण्यासाठी नक्कीच दडपण आहे.
हार्दिकने चारही षटके टाकली
दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने पुन्हा एकदा प्रभावित करताना जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांच्या महत्वपूर्ण विकेट मिळवल्या. तसेच अष्टपैलू हार्दिक पांड्याने या सामन्यात चारही षटके टाकली ही भारतासाठी शुभवार्ता म्हणता येईल. तसेच भुवनेश्वर कुमारही चांगली गोलंदाजी करताना दिसला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारत याच संघासह खेळणार की संघात काही बदल करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.