इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत भारताचे दोन्ही डाव गडगडले. भारताने अखेरच्या आठ विकेट पहिल्या डावात ५७ धावांत, तर दुसऱ्या डावात ६३ धावांतच गमावल्या. भारताने पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यांत पाच प्रमुख गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक रिषभ पंतला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. मात्र, त्याला धावांसाठी झुंजावे लागले आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत भारताने एका गोलंदाजाला वगळून अतिरिक्त फलंदाजाला खेळवले पाहिजे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले आहे. परंतु, त्यासाठी कर्णधार विराट कोहलीने नकार दिला आहे.
डाव सावरेलच याची खात्री नाही
माझा सहा फलंदाज, एक यष्टीरक्षक आणि चार गोलंदाज या रणनीतीवर विश्वास नाही. तुम्ही सामन्यात पराभूत न होण्यासाठी खेळू शकता किंवा सामना जिंकण्यासाठी खेळू शकता. तुमच्या अव्वल सहा फलंदाजांना (यष्टिरक्षकासह) चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्यास अतिरिक्त फलंदाज तुमचा डाव सावरेलच याची खात्री नाही, असे कोहली म्हणाला.
केवळ जिंकण्यासाठी खेळतो
कसोटी सामना जिंकण्यासाठी २० विकेट घेणे सर्वात महत्त्वाचे असते. तुमच्या संघात २० विकेट घेण्याची क्षमता नसल्यास तुम्ही दोन निकालांसाठी (सामना अनिर्णित ठेवणे किंवा पराभूत होणे) खेळता. आम्ही केवळ जिंकण्यासाठी खेळतो, असे कोहलीने स्पष्ट केले. तसेच तिसऱ्या कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत भारतीय संघ कमी पडल्याचेही कोहलीने कबूल केले.
हेही वाचा – Tokyo Paralympics : भारतीयांचे दुहेरी ‘सुवर्ण’ यश