इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला आजपासून सुरुवात झाली. या जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धेच्या आयोजनात व्यस्त असतानाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीचे टी-२० वर्ल्डकपकडे दुर्लक्ष झालेले नाही. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-२० वर्ल्डकप होणार आहे. मात्र, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ही वर्ल्डकप स्पर्धा इतरत्र हलवण्याचा विचार करावा लागू शकेल, असे काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलर्डाइस म्हणाले होते. मात्र, यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतातच होईल असा गांगुलीला विश्वास आहे.
परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशा
गांगुलीने काही दिवसांपूर्वी सर्व राज्य क्रिकेट संघटनांचे अध्यक्ष आणि सचिव यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्याने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सलामीच्या सामन्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. तसेच त्याने टी-२० वर्ल्डकप भारतात होईल असा विश्वासही व्यक्त केला. आगामी क्रिकेट मोसमात सर्व परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशा आहे. तसे झाल्यास आपल्याला सर्व स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे आणि सर्वोत्तम टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करता येईल असा विश्वास असल्याचे गांगुली या पत्रात म्हणाला. भारतात कोरोनाचा धोका वाढत राहिल्यास आयसीसीला यंदाचा टी-२० वर्ल्डकप युएई किंवा न्यूझीलंडमध्ये घ्यावा लागू शकेल.