कोरोनाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला असून क्रिकेटही याला अपवाद नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, क्रिकेटपटूंना विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. क्रिकेटपटूंना जैव-सुरक्षित वातावरणात (बायो-बबल) राहावे लागत असून हॉटेल आणि स्टेडियममध्ये असताना त्यांना विविध निर्बंधांचे पालन करावे लागत आहे. या गोष्टीचा आता खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला होता. मात्र, असे असले तरी या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारताचे खेळाडू सक्षम असून ते परदेशी खेळाडूंपेक्षा अधिक सहनशील असल्याचे मत बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले.
हार मानत नाहीत
परदेशी खेळाडूंच्या तुलनेत भारताचे खेळाडू अधिक सहनशील असतात हे मी ठामपणे सांगू शकतो. मी याआधी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांच्या खेळाडूंसोबत खेळलो आहे. ते मानसिकदृष्ट्या लवकर खचतात. मात्र, भारतीय खेळाडू आव्हानात्मक परिस्थितीतही हार मानत नाहीत, असे गांगुली म्हणाला.
त्यांच्यावर खूप दडपणही येते
मागील सहा-सात महिने क्रिकेटपटूंसाठी खूप अवघड राहिले आहेत. खेळाडूंनी खूप सामने खेळले असून त्यांना जैव-सुरक्षित वातावरणात राहावे लागत आहे. त्यामुळे हॉटेलमधील रूम ते मैदान इतकाच प्रवास त्यांना करता येतो. त्यांच्यासाठी हा अनुभव नवा आणि वेगळा आहे. मात्र, याच कारणाने त्यांच्यावर खूप दडपणही येत आहे, असेही गांगुलीने नमूद केले.