मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत धावांसाठी झुंजावे लागत आहे. मुंबईने आतापर्यंत चार सामने खेळले असून एकदाही त्यांना १६० धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. मात्र, असे असतानाही मुंबईला दोन सामने जिंकण्यात यश आले. मुंबईच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत कोलकाताविरुद्ध १५२, तर हैदराबादविरुद्ध १५० धावा यशस्वीरीत्या रोखल्या होत्या. गोलंदाजांमुळे मुंबईने दोन सामने जिंकल्याचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला आनंद आहे. मात्र, आमच्या फलंदाजांनी अधिक धावा केल्यास गोलंदाजांचे काम थोडे सोपे होईल, असे तो म्हणाला. शुक्रवारी मुंबईचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे.
चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक
आमचे मधल्या फळीतील फलंदाज त्यांच्या कामगिरीने खुश नसतील. पंजाबविरुद्धचा सामना हा चेन्नईत आमचा अखेरचा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी आमचे फलंदाज उत्सुक आहेत. आम्हाला यंदाच्या मोसमाच्या अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. आमच्या फलंदाजांनी अधिक धावा केल्यास गोलंदाजांना नक्कीच मदत होईल, असे बोल्ट म्हणाला.
अधिक धावा करणे महत्वाचे
आमच्या संघाची खासियत म्हणजे आम्ही शेवटपर्यंत हार मानत नाही. गोलंदाजांच्या कामगिरीमुळे आम्ही सामने जिंकल्याचा आनंद आहे. मात्र, फलंदाजांनी अधिक धावा करणे महत्वाचे आहे. पंजाबविरुद्धचा हा सामना चुरशीचा होईल अशी मला अपेक्षा आहे, असे बोल्टने नमूद केले. बोल्टने यंदा चार सामन्यांत सहा विकेट घेतल्या आहेत.