टी-२० विश्वचषकात गुरूवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव करून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला ७४ धावांचे तुरळक आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या ६.२ षटकांत पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरोन फिंचने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा सहज विजय झाला. मोठ्या फरकाने जिंकलेल्या या सामन्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा नेट रनरेट वाढला असून याचा फायदा संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी होणार आहे. प्रथम गोलंदाजी करताना गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या बदल्यात ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवता आला. फिरकीपटू झाम्पाने त्याच्या ४ षटकांत केवळ १९ धावा देत ५ बळी घेतले. बांगलादेशची फलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक गोलंदाजीसमोर अपयशी झाल्याचे पहायला मिळाले. बदल्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला ७४ धावांचे तुरळक आव्हान दिले होते.
तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने सांघिक खेळीच्या जोरावर बांगलादेशला अवघ्या ७३ धावांवर गुंडाळले. झाम्पा पाठोपाठ मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड प्रत्येकी २-२ बळी घेत सामन्यावर पकड मजबूत केली. तर ग्लेन मॅक्सवेलला १ बळी घेण्यात यश आले.तर बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि शरीफुल इस्लाम या दोघांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
बांगलादेशकडून निराशाजनक फलंदाजी झाली. कोणत्याच फलंदाजाला २० पेक्षा जास्त धावसंख्या उभारता आली नाही. शमीम हुसेनने सर्वाधिक १९ धावा केल्या. प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमक माऱ्यासमोर संघाला २० षटकांचा देखील सामना करता आला नाही. केवळ ७३ धावांवर बांगलादेशचा संघ चितपट झाला. हा सामना बांगलादेशचा स्पर्धेतील शेवटचा सामना आहे. संघाला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही.