यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतातून युएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आल्याची अधिकृत घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज केली. तसेच हा वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पाड पडणार असल्याचेही आयसीसीने जाहीर केले आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतामध्ये होणार होता. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, पण धोका पूर्णपणे टाळला नसल्याने ही स्पर्धा भारताबाहेर हलवणे भाग पडल्याचे आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच आता टी-२० वर्ल्डकप युएई आणि ओमानमध्ये होणार असला, तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळच (BCCI) या स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले.
चार मैदानांवर होणार सामने
टी-२० वर्ल्डकपचे सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी येथील शेख झाएद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे पार पडणार आहेत. पहिल्या फेरीचे सामने हे ओमान आणि युएई येथे पात्रता फेरी पार केलेल्या आठ संघांमध्ये होतील. यापैकी चार संघ हे मुख्य फेरीत म्हणजेच सुपर १२ मध्ये प्रवेश करतील. जगातील अव्वल आठ संघांना आधीच या फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाईल.
🚨 ANNOUNCEMENT 🚨
Details 👉 https://t.co/FzfXTKb94M pic.twitter.com/8xEzsmhWWN
— ICC (@ICC) June 29, 2021
बीसीसीआय आयोजनासाठी उत्सुक
आता टी-२० वर्ल्डकप युएई आणि ओमानमध्ये होणार असला, तरी त्याचे आयोजन बीसीसीआयच करणार आहे. त्याविषयी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला, बीसीसीआय टी-२० वर्ल्डकप युएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यासाठी उत्सुक आहे. आम्हाला या स्पर्धेचे आयोजन भारतात करायला आवडले असते, पण कोरोनाच्या अनिश्चित परिस्थितीमुळे ते शक्य होणार नाही. परंतु, या जागतिक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता आम्ही आता ही स्पर्धा युएई आणि ओमान येथे आयोजित करू.