भारताचे नेमबाज काही वर्षांपूर्वीपर्यंत अंतिम फेरी गाठण्यात समाधान मानत होते. परंतु, आता त्यांची मानसिकता बदलली असून ते पदक जिंकण्याचा विचार करतात, असे म्हणत ऑलिम्पिक पदकविजेता नेमबाज गगन नारंगने सध्याच्या भारतीय नेमबाजांची स्तुती केली. २०१६ सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नेमबाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर मात्र विशेषतः भारताच्या युवा नेमबाजांनी उत्कृष्ट खेळ केला असून यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे. भारताच्या नेमबाजांनी लक्षपूर्वक खेळ केल्यास त्यांना पदके मिळवण्यात यश येईल, असा नारंगला विश्वास आहे.
सुरुवातीपासूनच पदकांचा विचार करतात
माझ्या काळात सुरुवातीला आम्ही केवळ अंतिम फेरी गाठण्याचा विचार करायचो. त्यानंतर पुढच्या स्पर्धेत आमचा पदक मिळवण्याचा प्रयत्न असायचा. परंतु, आताचे भारतीय नेमबाज अगदी सुरुवातीपासूनच पदकांचा विचार करतात. भारताचा हा मजबूत संघ असून आपले नेमबाज टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके मिळतील अशी मला आशा असल्याचे नारंग म्हणाला. भारतीय संघातील नेमबाजांना आता बराच अनुभव आहे. त्यांनी आयएसएसएफ वर्ल्डकपमध्ये भाग घेऊन बरीच पदके जिंकली आहेत, असेही नारंगने नमूद केले.
ऑलिम्पिक सर्वात अवघड स्पर्धा
भारतीय नेमबाजांनी वर्ल्डकप स्पर्धांमध्ये पदके जिंकली असली तरी आता ऑलिम्पिकमध्ये त्यांना वेगळा अनुभव येईल. ऑलिम्पिक ही कोणत्याही खेळाडूच्या कारकिर्दीतील सर्वात अवघड स्पर्धा असते, असे २०१२ लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नारंग म्हणाला. परंतु, भारताचे चांगली कामगिरी करतील असा त्याला विश्वास आहे. नारंगची शिष्या एलावेनिल वलारिवानचाही भारताच्या नेमबाजी संघामध्ये समावेश आहे. तिच्या कामगिरीवर नारंगची नजर असणार आहे.