अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील रासानिक कंपनीच्या भुयारी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या भुयारी टाकीत असलेल्या गॅसमुळे या तिन्ही कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. अंबरनाथ पश्चिमेकडील आयटीआय इंडस्ट्रीयल ईस्टर कंपनीत ही घटना घडली आहे. या कंपनीच्या आवारातील केमिकल टाक्यापैकी एका टाकीत चार कामगार सकाळी साडे आठच्या सुमारास सफाई करण्यासाठी उतरले होते. याच सफाईदरम्यान टाकीतील गॅसमुळे गुदमरु लागल्याने एक कामगार बाहेर पडला. पण तिघे जण टाकीतच बेशुद्ध पडले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. हर्षद, बिंदेश आणि दिनेश अशी मृत कामगारांची नावे आहेत.
ही कंपनी गेली दोन वर्षे बंद होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून कंपनीत साफसफाई, नुतनीकरणाचे काम सुरु होते. या कामासाठी गोवंडीतून चार कामगार आणण्यात आले होते. यातील तीन कामगारांचा यात मृत्यू झाला आहे तर एकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृत पावलेले तीनही कामगार मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते.
या सफाई कामगारांना टाकीत उतरण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक यंत्रणा, तसेच बचावासाठी चांगेल मास्क, ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले नव्हते. त्यामुळे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या तीन निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याचे आरोप केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पालिका अग्निशमक दल, एमआयडीसी अग्निशमन दल आणि उल्हासनगर महापालिका अग्निशमन दर घटनास्थळी रवाना झाले. या तिन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत. या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा दिसून आला असून संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाची आता पोलीस कसून चौकशी करत आहेत.