ठाणे । जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहापूर आणि मुरबाड भागात पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात उद्भवली असून शहापूर पंचायत समिती हद्दीमध्ये 33 आणि मुरबाड पंचायत समिती हद्दीमध्ये 2 असे एकूण 35 टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे सुरू झाले असल्याचे ठाणे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. पावसाळा अद्यापही दूर असून कडक उन्हाचे चटके नागरिकांना बसने सद्या सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्याच्या दुष्काळातून सामोरे जावे लागत आहे.
शहापूर आणि मुरबाड ह्या परिसरातील ग्रामीण भागात नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल सुरु आहेत. ह्या परिसरातील विहीर तसेच पाणी साठा असलेले तलाव यांचे भूगर्भातील पाणी खोल वर गेले आहे. यामुळे शहापूर येथील 34 पाडे, 140 गावे असे एकूण 174 ठिकाणी पाणीपुरवठा सुरु आहे. तर मुरबाड पंचायत समिती हद्दीमध्ये 2 गावे 2 पांड्याना पाणी पुरवठा करणे सुरु आहे. शहापूर पंचायत समिती हद्दीमधील कसारा खुर्द, फुगाळे, धामणी, कळभोंडे, कोथळे, अजनूप, कोठारे, विहिगाव, अजनूप, वाशाला, माळ, विहिगाव, वेळुक, उंबरखांड, वरस्कोल, ढाढरे, लाहे, दहिगाव, टेंम्भा, नांदवळ, आटगाव, कलमगाव, वांद्रे, साकडबाव, काठारे,अघई, पिवळी, ढाकणे, शीळ, कळभोडे, वेळूक, साकडभाव, तलवाडा, आटगाव, वेहलोंढे, लाहे, शिरगांव, उंबरखाड आदी ग्रामपंचायतीमधील गाव, पाडे पाणी टंचाईग्रस्त झाले असून पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल सुरु झाले आहेत.
मुरबाड पंचायत समिती हद्दीत दिवाणपाडा,मोहघर हि गावे तसेच गुगाळवाडी, पांडूचीवाडी, तोंडलीपाडा, वाघाची वाडी, आंबेमाळी, बाटलीचीवाडी, कातकरीवाडी हे पाडे तहानलेले आहेत. काही दिवसापूर्वीच शहापूर परिसरात अवकाळी पाऊस पडला. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे हंगामी पिकांचे नुकसान झाले तर काहींच्या घराचे देखील नुकसान झाले. पन उन्हाचे तापमान वाढत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली असल्याने शहापूर, मुरबाड भागातील ग्रामीण भागातील गाव, पांड्याना पाण्याच्या दुष्काळाला सामोरे लागत आहे. यामुळे ठाणे जिल्हापरिषदेच्या वतीने 35 पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करणे सुरु आहे. दरदिवशी पाणीपुरवठा करणार्या टँकरची मागणी वाढत असून पावसाळा सुरुवात होत नाही तो पर्यंत टँकर द्वारे विहिरीमध्ये पाणी पुरवठा करणे सुरु आहे.