निसर्गाचे मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या निसर्गाच्या महत्वाच्या स्त्रोतांपैकी एक स्त्रोत म्हणजे जंगल किंवा वने. निसर्गापासून मिळणाऱ्या वनसंपदेचा मानव पुरेपुर वापर करत आहे. त्यामुळे जगभरात मोठ्याप्रमाणात वृक्षतोड होताना दिसत आहे. वाढती वृक्षतोड थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर विशेष मोहिम राबवली जात आहे. मात्र आपण वनसंवर्धन करण्यास कुठे तरी कमी पडत आहोत. यामुळे लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी २१ मार्च हा दिवस “जागतिक वन्य दिवस” म्हणून साजरा केला जातो.
मानवी जीवनाचे आणि वन्यजीवनाचे परस्पर नाते आहे. मात्र मानवी जीवन जस-जसे प्रगत होत गेले तस-तसे मानव निसर्गापासून दूर जाऊ लागला. कारण हिरवी शाल नेसलेल्या निसर्गाचा ऱ्हास करत त्याजागी सिमेंट काँक्रिंटचे जग मनुष्य उभारू लागला. आज मनुष्य अगदी चंद्रावर जरी पोहचला असला तरी तेथे जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनचीच गरज पडते. त्यामुळे मनुष्य कितीही निसर्गापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याला जगण्यासाठी निसर्गचं मुख्य आधार आहे. परंतु वाढत्या जंगलतोडीमुळे नैसर्गिक साधनांचा भावी पिढीला तुटवडा निर्माण होणार आहे. भारतासारख्या कृषीप्रधान राष्ट्रात वनांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भारतात वनसंपदा, वन्यजीवन टिकवून ठेवायेच असेल तर आपणचं प्रयत्न केले पाहिजे. याच जागतिक वन्य दिनानिमित्त आपणही एक तरी झाड लावण्याचा संकल्प करु. या दिनानिमित्त भारतासह जगभरात वृक्ष समृद्धीवर अवलंबून मनुष्य जीवन आणि अर्थकारण या अनुषंगाने विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जात आहेत.
‘या’ देशातून झाली ‘जागतिक वन्य दिना’ची सुरुवात ?
जागतिक वन्य दिनाची सुरुवात युरोप देशातून झाली. युरोपमध्ये १९ व्या दशकापासून विकासाच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात वृक्षतोड सुरु झाली. घनदाट जंगलांच्या ऱ्हास करत मनुष्य मानवी वस्ती निर्माण करु लागला. याचदरम्यान अनेक डोंगराळ भागात वृक्षतोड करत मोठ-मोठे उद्योगधंदे उभारले जाऊ लागले. याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला. त्यामुळे युरोपात वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली. मात्र तरीही वनांचे महत्त्व जाणून घेण्यात मनुष्य कमी पडत होता. हे सर्व परिणाम पाहता युरोपियन कॉनफिडरेषण ऑफ अग्रिकल्चरने १९७१ पासून पहिल्यांदा जागतिक वन्य दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने २८ नोव्हेंबर २०१२ मध्ये एक संकल्प पत्र सादर केले. ज्यामध्ये २१ मार्च हा दिवस ‘जागतिक वन्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार असे घोषित केले.