राज्यात सत्ता स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता संघर्ष सुरू असल्याने युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, मात्र, युती तुटली तर स्थानिक स्वराज्य संस्थेत त्याचा कितपत प्रभाव पडेल? यावर आता चर्चा रंगू लागली आहे. पण ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही महापालिकेवर शिवसेना पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे युतीचे काहीही होवो ठाणे आणि केडीएमसीत शिवसेनेची सत्ता कायम राहणार आहे. ठाणे आणि कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओखळला जातो. गेल्या अनेक वर्षापासून या महापालिकांवर भगवा झेंडा फडकत आहे.
आकडेवारीत शिवसेनाच अव्वल!
ठाणे महापालिकेत ६७ जागांसह शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरला आहे. तर त्या पाठोपाठ ३४ जागा मिळवणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसऱ्या स्थानी आहे. भाजप तिसऱ्या स्थानी असून त्यांचे २३ नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेसाठी ६६ ही मॅजिक फिगर आहे. त्यापेक्षाही अधिक सेनेच्या जागा आहेत. हीच अवस्था कल्याण-डोंबिवली महापालिकेत दिसून येते. केडीएमसीतही ५२ जागांसह शिवसेना एक नंबरचा पक्ष आहे. पाठोपाठ ४२ जागा मिळवणारा भाजप हा दुसऱ्या स्थानी आहे. तसेच ५ अपक्ष हे शिवसेनेच्या बाजूने तर ५ भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे शिवसेनेकडे ५७ तर भाजपकडे ४७ संख्याबळ आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी ६१ जागांची गरज आहे. त्यामुळे केडीएमसीतही शिवसेना-भाजपशिवाय सत्ता स्थापन करू शकते. त्यामुळे राज्यात युती तुटल्यास त्याचा ठाणे आणि कल्याण महापालिकेवर कोणताही परिणाम होऊ शकत नाही.
केडीएमसी पक्षीय बलाबल
शिवसेना – ५२
भाजप – ४२
मनसे – ०९
काँग्रेस – ०४
राष्ट्रवादी – ०२
एमआयएम – ०२
अपक्ष – १०
ठाणे महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना – ६७
भाजप – २३
राष्ट्रवादी काँगेस – ३४
काँग्रेस – ०३
एमआयएम – ०२
अपक्ष – ०२