काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना कमालीचा आनंद झाला आहे. पाकिस्तानची अतिरेकी संघटना जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी आणि भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या मसूद अजहर याला आनंदाच्या उखळ्या फुटल्या आहेत. त्याने एक नवीन व्हिडिओ जारी केला. त्यात, ‘बरं झालं मोदी भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले,’ असे म्हटले आहे.
बरे झाले मोदी भ्रष्टाचारात अडकले. आता ते भारताच्या लष्करप्रमुखांना पुढे करून पाकिस्तानला धमकावत आहेत. भारत-पाक युद्ध व्हावे, असे आम्हाला वाटत नाही. आमचे मुजाहिदीनच भारताला धडा शिकवतील. भारतातील एका लॉबीच्या दबावाखालीच पाकिस्तान भारताशी चर्चा करू इच्छित आहे. पाकिस्तानच्या चुकांमुळेच भारताचा आत्मविश्वास वाढला आहे.
जिहाद-ए-काश्मीरने भारताला धडा शिकवला आहे. त्यामुळे भारत युद्ध करण्याची चूक करणार नाही. सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा वल्गना मसूद अजहर याने केल्या आहेत.
‘पाकिस्तान सरकारने सहा महिन्यांसाठी आमच्या संघटनेवरील बंदी हटवल्यास भारताला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. भारत स्वत: घाबरलेला असून त्यांच्याकडून केवळ पोकळ धमक्या दिल्या जात आहेत’, असेही मसूद अजहरने म्हटले आहे.