एकीकडे कोलकात्यामध्ये देशभरातल्या भाजपविरोधी पक्षांची महारॅली भरली असून या रॅलीमध्ये भाजपकडून केल्या जात असलेल्या गैरप्रकारांबद्दल टीका केली जात असतानाच दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या २ दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी ‘भाजप इक्वॅलिटीवर काम करणारा पक्ष’ असल्याचं प्रतिपादन केलं आहे. ‘नागपुरात दलित समाज नेहमीच भाजपच्या पाठिशी उभा राहिला आहे. कारण भाजपमध्ये जातीचं राजकारण चालत नाही. शिवाय जातीच्या नावावर कुणी राजकारण केलं, तर त्याला खपवूनही घेतलं जात नाही,’ असं देखील गडकरी यावेळी म्हणाले.
‘भाजप माँ-बेट्याचा पक्ष नाही’
यावेळी बोलताना गडकरींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ‘काँग्रेसने आमचा चुकीचा प्रचार केला आहे. भाजप उच्च जातीच्या लोकांचा पक्ष असून तिथे अस्पृश्यता आहे, पण तसं नसून आम्ही समानतेवर काम करतो’, असं गडकरींनी यावेळी सांगितलं. तसेच, ‘भाजप हा माँ-बेट्याचा पक्ष नाही, एक नेता आणि बाकी कार्यकर्ता अशी परिस्थिती इथे नाही’, असं म्हणत नितीन गडकरींनी काँग्रेसला शेलक्या शब्दांमध्ये टोला हाणला.
हेही वाचा – आम्हाला घाबरून विरोधक एकवटले – नितीन गडकरी
‘फडणवीसांनी इंदू मिलचा प्रश्न सोडवला’
दरम्यान, यावेळी नितीन गडकरींनी इंदू मिलचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सोडवल्याचं सांगितलं. ‘इतकी वर्ष सत्तेत राहूनही काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा इंदू मिलमधल्या स्मारकाचा प्रश्न सुटू दिला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच इंदू मिलचा प्रश्न सोडवला’, असा दावा गडकरींनी यावेळी केला.