सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु असून त्यामुळे रेल्वे सेवाही बंद आहे. येत्या १४ एप्रिलला लॉकडाऊनचा कालावधी संपणार असला तरी मुंबईची जीवनवाहिनी असेलेली उपनगरीय लोकल सेवा एप्रिल महिन्यात बंदच राहणार असल्याची माहिती रेल्वे महामंडळाच्या सुत्रांनी ‘दैनिक आपलं महानगरला दिली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात इतका काळ लोकल सेवा बंद राहण्याची ही पहिलीच घटना आहे. रेल्वे सुरु करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
मुंबईत करोनारुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे मुंबईचा लॉकडाऊन लांबणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा सुरु होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेव्हा मुंबईचा लॉकडाऊन पूर्णपणे संपणार त्याच्या पाच दिवसांनंतर रेल्वे प्रशासन लोकल आणि रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेणार आहे. मात्र आता रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे महामंडळ मुंबईसह देशभरात करोनाच्या वाढता संसर्गावर लक्ष ठेऊन आहे. या आपत्कालीन परिस्थिती देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष मालवाहतूक आणि विशेष पार्सल गाड्या चालविण्यावर भर दिला जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यावर भर
करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने २४ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान प्रवासी, मेल आणि एक्सप्रेस ट्रेन सेवा रद्द केल्या आहेत. देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष मालवाहतूक आणि विशेष पार्सल गाड्या कार्यरत आहेत.तसेच त्या गाड्याची देखभाल आणि भारताच्या कानाकोपर्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यावर रेल्वे भर देत आहे.