राज्यात हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी हाहाकार केला आहे. पुणे, सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपल्याने जिल्ह्यात पाणीच पाणी साठले असून नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचं पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर इथे महामार्गाववर आलं असल्याने सोलापूर हायवेवरची वाहतूक थांबवली आहे. पुणे शहर आणि उपनगरांतही पावसाचा जोर कायम असल्याने रात्री उशीरा मुठा नदीपात्रातही पाणी सोडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra: Water release from Ujjani Dam, Solapur increased to 200,000 cusecs due to continuous rainfall in Pune
— ANI (@ANI) October 14, 2020
उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याची पातळी वाढल्याने सोलापूर जिल्ह्यात धोका निर्माण झाला आहे. उजनीतून होणारा विसर्ग 200,000 क्यूसेक्सपर्यंत वाढवण्यात आला आहे. पुण्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड पाणी साचल्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. भिगवण आणि इंदापूरच्या मध्ये महामार्गावर सुमारे दोन फूट पाणी साठलं आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा अवघड झाली आहे. पुणे जिल्ह्यात तुफान आलं! विजांच्या कडकडाटासह आलेल्या धुवांधार पावसाने इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याचे सांगितले जात आहे.
कोकण, मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार
कोकणासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने जोर पकडला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचं मोठे नुकसान झालेले असून, कापणीला आलेले भात पडून पुन्हा रुजून आलं आहे. कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, उरण परिसरात जोरदार पाऊस पडतोय. वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. वर्धा, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणघाट आणि सेलू तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपून काढलेय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच सोयाबीनचे पीक खराब होण्याची शक्यता आहे. सोबतच कपाशी पिकालाही याचा फटका बसणार आहे.