घरमहाराष्ट्रयोग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा

योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा

Subscribe

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले निर्देश

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते.

कोरोनाची जागतिक परिस्थिती पाहता या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शाळांचे वेळोवेळी सॅनिटायजेशन करणे, शिक्षकांची कोरोना तपासणी करणे यासारख्या सर्व बाबींची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सुचवले आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत, अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये आणि त्यांच्या उपस्थितीचा आग्रही शाळांनी धरू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

- Advertisement -

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी बैठकीत स्पष्ट केले. २३ नोव्हेंबर पासून सुरू होणार्‍या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. सुरक्षेचा उपाय म्हणून एका बेंचवर एक विद्यार्थी आणि एकदिवसाआड वर्ग भरवणे, विद्यार्थ्यांना घरून जेवण करून येण्याची सक्ती, घरचे पाणीही आणण्यास सांगण्यात आले. चार तासांच्या शाळेत विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळा टप्प्या टप्प्याने सुरू कराव्यात. यासाठी आवश्यक एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असे अप्पर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -