दादरच्या इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक कधी होणार याची उत्सुकता राज्यातील सर्वांना लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ एप्रिल २०२० पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करू अशी घोषणा केली होती. मात्र एकंदरीत या स्मारकाच्या कामाची गती पाहता पुढील १५ महिन्यांत स्मारकाचे काम पूर्ण होणार का? असा सवाल आता भीमसैनिकांकडून केला जात आहे.
मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण करू. 6 डिसेंबर 2019पासून स्मारकाचे काम सुरू झालेले असेल, असे आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत फक्त पायलिंगचे काम सुरू असून 14 एप्रिल 2020 पर्यंत काम कसे काय पूर्ण होणार असा प्रश्न आता राज्यातील लाखो आंबेडकरी जनतेला पडू लागला आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबतचा जो आराखडा बनण्यात आला आहे त्याला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आक्षेप घेतला. जे स्मारक बनणार आहे ते बाबासाहेबांना साजेशे नाही त्यामुळे आमचा विरोध आहे, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगितले. त्यामुळे फडणवीस यांनी 6 डिसेंबरला याबाबत बैठक बोलावू, त्यात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, एमएमआरडीएचे आयुक्त आणि आनंदराज आंबेडकर असतील, असे सांगितल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी ‘आपलं महानगर’ला दिली आहे.
स्मारकाच्या सर्व परवानग्या पूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इंदू मिल येथे सार्या जगाला हेवा वाटेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून 14 एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. एप्रिल 2019 पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरुपात दिसेल, अशी माहिती फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात दिली होती. तसेच मुंबईत येणार्या प्रत्येक नागरिकाला स्मारकाच्या भव्य उंचीमुळे वांद्रे -वरळी सी लिंकवरूनदेखील दर्शन घेता येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. स्मारकाचे काम कालबद्ध पद्धतीने होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी एप्रिल महिन्यात एका कार्यक्रमाच्या वेळी सांगितले होते.
स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर-नवाब मलिक
2015 मध्ये बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही.स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही…टेंडर काढण्यात येत नाही…वर्क ऑर्डर निघत नाही… 6 डिसेंबर आला की, एखाद्या अधिकार्याला न्यायचे आणि खोदकाम सुरु करायचे आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
विरोधकांचे आरोप जनतेची दिशाभूल करणारे -केशव उपाध्ये
राज्याचा मानबिंदू ठरेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदू मिलच्या जागेवर उभारण्याचे काम वेगाने सुरू असून तेथील पायलिंगचे कामही पूर्ण झाले आहे. सत्ताभ्रष्ट झाल्याने सैरभैर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने वाट्टेल ते आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये, असा टोला भाजपने लगावला आहे.
सध्या संशोधन केंद्रासाठीचे खोदकाम सुरू आहे. ७८४ शोअर पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या बांधकामाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत होत होती, तशी केवळ घोषणाबाजी भाजपाच्या काळात होत नाही, असे पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.