महापारेषणच्या उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी (१२ ऑक्टोबर) मुंबई महानगर प्रदेशातील वीज पुरवठा दीर्घकाळ खंडित झाला होता. यावरुन विरोधक राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक ट्विट करत खळबळजनक दावा केला आहे. मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात असल्याचा दावा नितीन राऊत यांनी केला आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरातील वीजपुरवठा एकाचवेळी खंडित झाल्याने जनजीवन ठप्प झालं होतं. रेल्वे वाहतूक, कार्यालयीन कामकाज, रुग्णालये, कोविड सेंटर आणि दैनंदिन व्यवहारांना मोठा फटका बसला होता. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली. या पार्श्वभूमीवरर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी खळबळजनक ट्विट केलं आहे. “सोमवार दिनांक १२.१०.२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असं ट्विट केलं आहे.
सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020
या प्रकाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दाखल घेत तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते. दरम्यान, आता उर्जामंत्र्यांच्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.