दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या भागामधल्या शाळांना सुट्टी असते. त्यामुळे बच्चेकंपनीची धम्माल असते. यंदा मात्र उद्याच्या सुट्टीसंदर्भात कोणतीही जाहीर घोषणा करण्यात न आल्यामुळे शाळकरी मुलांचा हिरमोड झाला होता. तर काही ठिकाणी संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र, यावर आता शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि शिक्षण विभागाने उद्याच्या सुट्टीसंदर्भात जाहीर पत्रकच काढलं आहे. राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या या पत्रकामध्ये शनिवारी शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं नमूद केलं आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे दरवर्षी
दहिहंडीची सुट्टी जिल्हाधिकारी जाहीर करतात.यावर्षी उद्या शनिवार शासकीय कामकाज नसल्याने जिल्हाधिकांनी ही सुट्टी जाहीर केलेली दिसत नाही. तथापि या विभागात उद्या शालेय शिक्षण विभागातर्फे शाळा व ज्युनियर काँलेजला सुट्टी जाहीर करीत आहोत. @MahaDGIPR pic.twitter.com/8GWdPS4Z54— ashish shelar (@ShelarAshish) August 23, 2019
वास्तविक दरवर्षी या दिवशी शाळा आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांना सुट्टीच असते. मात्र, यावर्षी दहीहंडी शनिवारी आली आहे. चौथा शनिवार असल्यामुळे या दिवसी शासकीय कार्यालयांना सुट्टीच असते. त्यामुळेच कदाचित जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टी जाहीर केली नसावी असं आशिष शेलार यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. तसेच, या शाळा आणि महाविद्यालयांना तसे कळवण्यासंदर्भात देखील शिक्षण संचालकांना सांगण्यात आलं आहे.