काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना किती जागा सोडायच्या यावरून मोठी चर्चा झाल्यानंतर अखेर २०+२०+८ असा फॉर्म्युला ठरला असून भारिप बहुजन महासंघाला ८ जाहा सोडण्याचं दोन्ही काँग्रेसने मान्य केलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता विविध मुद्द्यांवरून भाजपला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी भाजपच्या ४३ जागांच्या दाव्याचा समाचार घेतला. राज्यामध्ये भाजपने किमान ४० जागांच्या ठिकाणी मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात आणि मग ४३ जागांवर जिंकून येण्याबद्दल दावा करावा, असं आव्हानच प्रकाश आंबेडकरांनी दिलं आहे.
अमोल पालेकर प्रकरणावर परखड टीका
दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकरांनी अमोल पालेकरांना भाषण करताना थांबवलं या प्रकरणाचा निषेध केला. एनजीएमएमध्ये अमोल पालेकर भाषण करत असताना संस्थेच्या चुकीच्या गोष्टींवर ते बोलायला लागताच त्यांना थांबवण्या आलं. मात्र, ‘भाजप आरएसएसचा अजेंडा राबवत आहे. अमोल पालेकर प्रकरणावरून तरी तसंच वाटतंय’, असं आंबेडकर यावेळी म्हणाले. ‘सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. पश्चिम बंगालमधघ्ये देखील तेच झालं. या हुकुमशाही वृत्तीमुळेच हे होत आहे’, असं देखील त्यांनी सांगितलं.
मनुवादी मोदी सरकार आल्यापासून या देशात सातत्याने विचारवंतांचा आवाज दाबला जात आहे… आज #AmolPalekar यांना सुद्धा जाहीर कार्यक्रमात बोलण्यापासून अडवण्यात आलं. या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. #Speakupnow
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 10, 2019
२३ फेब्रुवारीला शिवाजी पार्कात ओबीसी आरक्षण परिषद
येत्या २३ फेब्रुवारीला दादरच्या शिवाजी पार्क मैदानात ओबीसी आरक्षण परिषद घेणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. ‘ओबीसी आरक्षणात कोणत्याही उच्चवर्णीय जातीस घुसखोरी करू देऊ नये. मंडल आयोगाची १०० टक्के अंमलबजावणी करावी. ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण दयावे. अर्थसंकल्पात ५२ टक्के ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येनुसार निधीची तरतूद करावी’, अशा काही मागण्या यावेळी आंबेडकरांनी केल्या. तसेच, ‘मुंबईतले आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी यांची २०० गावठाणे आहेत. यांचे सीमांकन करून त्याचे प्रॉपर्टी कार्ड भूमिपुत्रांना मिळावेत. त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याच प्रमाणे झोपडपट्ट्यांचा विकास गावठाण हक्क कायद्याने व्हावा. क्लस्टर आणि एस आर ए ला आमचा विरोध कायम राहील’, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.