वर्ल्ड कप २०१९ साठी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची नावे आज जाहीर होणार आहेत. ३० मे २०१९ पासून वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात कोण कोणत्या खेळाडूला स्थान मिळेल, याची उत्सुकत्ता प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्याने शेअर केलेल्या नावांमध्ये आठ बदल केले आहेत. याशिवाय त्याने लिहिले आहे की, ‘वर्ल्ड कप २०१९ साठी भारतीय क्रिकेट टीम. ७ खेळाडू २०१५ च्या टीमचे आणि ८ खेळाडू बदलले. तुमची टीम कुठली?’, असा प्रश्न त्याने ट्विटरवर विचारला आहे.
टीममध्ये काय आहेत बदल?
विरेंद्र सेहवागने केलेल्या ट्विटमध्ये २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. तर २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संभाव्य नावे दुसऱ्या बाजूला आहेत. सहवागच्या अनुमानानुसार यावर्षीच्या वर्ल्ड कमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा, बी कुमार, मोहम्मद शमी या ७ खेळाडूंना पुन्हा संधी मिळू शकते. तर २०१५ च्या टीममधील सुरेश रैनाच्या जागेवर केदार जाधव, अजिंक्य रहाणेच्या जागेवर के. एल. राहुल, स्टीअर्ट बिन्नीच्या जागेवर हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विनच्या जागेवर कुलदीप यादव, अक्षर पटेलच्या जागेवर युझविंद्र चहल, उमेश यादवच्या जागेवर विजय शंकर, मोहित शर्माच्या जागेवर जसप्रीत बुमरा आणि अंबाती रायडूच्या जागेवर रिशभ पंतला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.
My Team India for the 2019 World Cup. 7 players from the 2015 team, 8 replacements ! What is your team ? pic.twitter.com/37QPZ9Z267
— Virender Sehwag (@virendersehwag) April 13, 2019
संजू सॅमसनलाही वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळावं – गंभीर
यासंदर्भात भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने ट्विट केले होते. ‘वर्ल्ड कप २०१९ साठी टीममध्ये कोण कोण असावे, यासंदर्भात मी बोलणार नाही. मात्र, संजू सॅमसनची आयपीएलमधील खेळी बघता त्याला वर्ल्ड कप २०१९ साठी टीममध्ये स्थान मिळायला हवे’, असे गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे. याशिवाय के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनाही टीममध्ये स्थान मिळायला हवे, असे गंभीर म्हणाले आहेत.