गेल्या चार वर्षात नवीन जलवाहिनीच्या कामाची २५ लाखाची फाईल मंजूर होत नसल्याने हताश झालेल्या बसपाच्या नगरसेविका सोनू अहिरे यांनी शनिवारच्या महासभेत आवाज उठविला. रस्ते, उड्डाणपूल आदी कामांसाठी कोटयावधी रूपयांच्या कामांच्या फायली मंजूर केल्या जातात. पण पिण्याच्या पाण्याची फाईल मंजूर का केली जात नाही? असा सवाल अहिरे यांनी उपस्थित केला. आयुक्तांकडूनही अपमानास्पद वागणूक मिळाल्याने नगरसेविका अहिरे महासभेत अक्षरश: रडल्या. मात्र, आयुक्त गोविंद बोडके हे बाहेर गेल्याने सभागृहात उपस्थित नव्हते. महापालिकेचे बजेट २ हजार कोटीचे असतानाच चार वर्षे जलवाहिनीच्या २५ लाखाच्या कामाची फाईल मंजूर होत नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. प्रशासनाकडून नगरसेवकांची कामे होत नसल्याची ओरडही भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात आली.
सर्वपक्षीय नगरसेवकांनीही प्रशासनाला धरले धारेवर
महापौर विनिता राणे यांनी शनिवारच्या महासभेत सोनू अहिरे यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अशावेळी माणेरे या प्रभागात आठवडयातून दोनदा पाणी येते. त्यामुळे इथल्या नागरिकांना चार दिवस साठवलेले पाणी प्यावे लागते. जनतेला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाण्याची नवीन लाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार केला होता. ३२ लाखाच्या कामाची ही फाईल २५ लाखापर्यंत करण्यात आली. गेल्या चार वर्षापासून पाण्याची नवीन लाईन टाकण्यासाठी २५ लाखाची फाईल मंजूर करण्यासाठी प्रशासनाच्या दरबारी पाठपुरावा करीत आहे. मात्र, अजूनही फाईल मंजूर झाली नसल्याने अहिरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. महापौरांकडेही बैठक झाली होती. त्यावेळी आयुक्तही ओरडून बोलल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. कोटयावधी रूपयांच्या फाईल मंजूर केल्या जातात. मात्र, हीच फाईल मंजूर का केली जात नाही? असा संतप्त सवाल अहिरे यांनी केला.
महिला नगसेवकांच्या फाईल मंजूर होत नाही
दादा भाई नगरसेवकांच्या कोटयावधी रूपयांचया फाईल लगेच मंजूर केल्या जातात आणि आम्हा महिला नगसेवकांच्या फाईल मंजूर होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता राजीव पाठक यांनी या कामांसाठी चार वेळा निविदा मागविण्यात आली होती. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अमृत योजनेतंर्गत पाईप लाईनची साडेपाच कोटीचे कामे तयार करण्यात आले आहे. २३ कामांना मंजूरी मिळाली असून ११ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांची फाईल मंजुरीसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या गोलमटोल उत्तरावर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे संतापले. सर्व सभागृहाची मागणी आहे ही फाईल मंजूर करून काम करा, अशा शब्दात अधिकाऱ्यांना खडसावले.
नगरसेवकांची कामे असतील तर प्रशासन कायद्यावर बोट ठेवतात
नगरसेवक मोहन उगले सचिन बासरे यांनीही प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विरोधी पक्षनेता प्रकाश भोईर मनसेचे गटनेता मंदार हळबे यांनीही प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली २० लाखाची तोंडी कामेही प्रशासनाने केली आहेत. त्यांना जे काम करायचे ते करतात. त्यानंतर मंजुरीसाठी महासभेपुढे आणले जाते. मात्र, नगरसेवकांची कामे असतील तर प्रशासन कायद्यावर बोट ठेवतात, असा आरोप हळबे यांनी केला आहे. भाजपचे गटनेता विकास म्हात्रे यांनीही नगरसेवकांची कामे होत नसल्याबद्दल तहकुबी मांडून नाराजी व्यक्त केली. तर अनेक नगरसेवक त्यांची व्यथा मांडत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा – कल्याणातील तलावांना घरघर