सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये महात्मा गांधी यांच्यावर आयोजित करण्यात आलेलं दोन दिवसांचं चर्चासत्रच रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. काही अज्ञात संघटनांनी चर्चासत्र न घेण्याबद्दल धमकावल्याचं आयोजकांकडून वक्त्यांना सांगण्यात आलं आहे. या वक्त्यांमध्ये खुद्द महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी हे देखील होत. ‘काही गांधींविरोधी संघटनांनी धमकी दिल्यामुळेच हे चर्चासत्र रद्द करावं लागत आहे’, असं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये ‘रीविझिटिंग गांधी’ या नावाखाली हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं.
दरम्यान, अशा कारणामुळे चर्चासत्र रद्द करावं लागलं असल्यामुळे तुषार गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
माझ्या उपस्थितीवर आक्षेप होता म्हणून कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याची धमकी आयोजकांना आली. त्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी कार्यक्रम रद्द केला. पण तिथे काही मी एकटा वक्ता नव्हता. त्यामुळे कार्यक्रम रद्द करून सगळ्यांचाच वेळ वाया घालवण्यात आला आहे. शिवाय माझं कारण सांगून कार्यक्रम रद्द करण्याचा बहाणा केला आहे का? असा देखील प्रश्न आहे.
तुषार गांधी, महात्मा गांधींचे पणतू
या चर्चासत्रामध्ये तुषार गांधी यांच्यासोबतच अन्वर राजन हे देखील उपस्थित राहणार होते. तुषार गांधी या चर्चासत्राच्या अध्यक्षपदी होते. या संदर्भात मॉडर्न महाविद्यालय किंवा हे महाविद्यालय जी संस्था चालवते, त्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीकडून या मुद्द्यावर स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.
जितेंद्र आव्हाडांची नाराजी
दरम्यान, या प्रकारावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘महात्मा गांधींचा द्वेष करणाऱ्या काही लोकांनी धमकी दिल्यामुळे पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधलं चर्चासत्र रद्द करावं लागणं हे निषेधार्ह आहे. पुणे पोलिसांनी हे घडू द्यायला नको होतं. यासंदर्भात मी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोललो असून त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे’, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
I just spoke to Honourable Home Minister Anil Deshmukh and told my concern over this he has promised action and he will talk to #TusharGandhi https://t.co/dPq1hww9ac
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 7, 2020