राज्य शासनाच्या वेगवेगळ्या ५६ हून अधिक रिक्त जागांवर नियुक्ती करावी यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या ३६ दिवसांपासून मराठा आरक्षणाचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलनाला एक महिना उलटून गेला तरी याबाबत ठोस निर्णय घेतला गेला नाही आहे. सोमवारी सकाळी या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीत ही आश्वासनांपलीकडे काही मिळालं नसल्याचं आंदोलनकर्ते सांगतात.
आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली
एकीकडे आंदोलनाला ३६ दिवस झालेत तर या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे. आतापर्यंत अनेक आंदोलकांवर वेगवेगळ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करुन सोडून देण्यात आले तर, अजूनही काही आंदोलक जीटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. उज्वल धावडे, अजित पवार या दोन आंदोलकांवर जीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. दरम्यान, शनिवारीही ओम धायगुडे, अतिष पाटील या दोघांना हॉस्पिटलमध्ये प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे दाखल करण्यात आलं होतं.
लवकरात लवकर तोडगा काढू
गेल्या ३५ दिवसांपासून हे आंदोलनकर्ते आझाद मैदानावर उन्हातही आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, हा प्रश्न सुटावा यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळेस, आंदोलनकर्त्यांना लवकरात लवकर या मागणीवर तोडगा काढू, असं आश्वासन संभाजीराजे यांनी दिलं आहे.
हेही वाचा – आता दादर रेल्वे स्थानकाबाहेर पकडा ई-टॅक्सी