घरCORONA UPDATEआता तुमची खैर नाही - अजित पवार

आता तुमची खैर नाही – अजित पवार

Subscribe

राज्यात लॉकडाऊन लागू असतानाही रस्त्यावर अनावश्यक कारणांसाठी फिरणाऱ्यांची आता काही खैर नाही, असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरला आहे.

कोरोनाविरुद्ध राज्य सरकारने कंबर कसली असून त्यासाठी अनेक पातळ्यांवर निर्णय घेतले जात आहेत. राज्यात गेल्या ८ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू असून तरी देखील भाजीपाला खरेदी करण्यासाठी किंवा किराणा खरेदी करण्यासाठी अनेकदा सांगून देखील मोठ्या संख्येने नागरिक बाहेर फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून कठोर पावलं उचलली जातील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ‘बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही’, असा स्पष्ट इशाराच उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

‘आता कठोर निर्णय घ्यावे लागतील’

मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथले काही भाग कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्ण सापडल्यामुळे सील करण्यात आले आहेत. मुंबईत तर १४६ भाग सील करण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा ३०० च्या वर गेल्यामुळे आता यासंदर्भात कठोर पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यातच, राज्याच्या काही भागांमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याची दृश्य पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे, ‘राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील’, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

- Advertisement -

‘इटली-इमेरिकेचा धडा घ्या’

दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला इटली-अमेरिकेतील परिस्थितीपासून धडा घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घेऊन जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जिवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, या सर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं’, असं ते म्हणाले. कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत’, असं म्हणत या सर्वांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.


हेही वाचा – ‘लॉकडाऊन’ दरम्यान LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण; समान्यांना दिलासा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -