सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि शेती क्षेत्रासाठी केंद्र सरकारतर्फे मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत MSME क्षेत्रासहीत, फुटपाथवरील दुकानदार आणि शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात आल्या. मंत्रिमंडळाने २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. २ लाख MSME युनिटला फायदा होणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. यासोबतच फुटपाथवरील दुकांनदारांसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. फुटपाथधारकांमध्ये फेरीवाले, गटई कामगार, सलून दुकानदारांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. या योजनेमुळे ५० लाख दुकानदारांना याचा लाभ होणार आहे.
MSME क्षेत्रासाठी घोषणा
१. मंत्रिमंडळाने आता MSME क्षेत्राची व्याख्या बदलली आहेत. काही दिवसांपूर्वी अर्थ खात्याने याबाबत घोषणा केली होती. याआधी २५ लाखांची गुंतवणूक आणि १० लाखांचे उत्पन्न असलेल्या क्षेत्राला सूक्ष्म उद्योग म्हटले जात होते. आता यापुढे १ कोटींची गुंतवणूक आणि ५ कोटी उत्पन्न असलेल्या उद्योगाला सूक्ष्म उद्योग म्हटले जाईल.
२. लहान उद्योगांसाठी आता २ कोटींची गुंतवणूक आणि ५० कोटींची उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आली आहे. याआधी ती ५ कोटी गुंतवणूक आणि १० कोटी उत्पन्न अशी होती.
३. तसेच मध्यम उद्योगांसाठी आता ५० कोटींची गुंतवणूक तर २५० कोटींच्या उत्पन्न मर्यादेची नवीन व्याख्या करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना हमीभाव
गेल्या काही काळापासून हमीभावाचा विषय अनेकदा चर्चेस आला होता. यावेळी कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना खर्चाच्या दीड पट हमी भाव दिला जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने १४ खरीप पिकांचा हमी भाव ५० वरुन ८३ टक्के वाढविला आहे. तसेच शेती आणि शेती संबंधित व्यवसायाशी निगडीत कामांसाठी ३ लाखांपर्यंत अल्पकालीन कर्जाच्या परतफेडीचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे.
फुटपाथवरील दुकानदारांसाठी योजना
फुटपाथवरील दुकानदारांसाठी १० हजार रुपयांच्या अल्पकर्जाची योजना जाहीर करण्यात आली आहे. हे कर्ज कसे मिळणार? यासाठी देखील सरकारकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून मोबाईल App आणि संकेतस्थळही तयार केले जाणार आहे.