“राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टीवर राजकारण आहे. दोन्ही माझ्या जवळ नाही.”, अशी खंत सुसाईड नोटमध्ये व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराध्यक्ष सुनील ईरावारने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे नांदेडमधील सर्वपक्षीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अवघ्या २७ वर्षीय सुनीलने अशी अचानक आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आज (रविवार) सकाळी सुनील ईरावारने गोकुंदा परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. सुनीलच्या कुटुंबियांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी सुनीलचा मृतदेह ताब्यात घेतला असून घराची पाहणी केली असता सुनील लिहून ठेवलेले पत्र त्यांना मिळाले.
काय लिहिले आहे पत्रात?
‘अखेरचा जय महाराष्ट्र’
“यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका”
“आई मला माफ कर, तुझाच सुनील”
“राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत.”
जय महाराष्ट्र,
जय राजसाहेब,
जय मनसे
“आई, पपा, काका, काकू , मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही सर्व जण मला माफ कराल, अशी अपेक्षा बाळगतो.”
त्याने आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकारणाचा भेसूर चेहरा सुनीलने उघड केला आहे. ग्रामीण भागातील जातीचे राजकारण आणि राजकारणासाठी लागणारा पैसा जवळ नसल्यामुळे सुनील सारख्या एका तरुण कार्यकर्त्याने आपले जीवन अकाली संपवले. माझ्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही, असे देखील सुनीलने आपल्या पत्रात म्हटले आहे.