पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर भारताने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या दुसऱ्या कसोटीसाठी संघात बरेच बदल केले. पहिल्या कसोटीच्या दोन डावांत मिळून ४ धावा करणाऱ्या पृथ्वी शॉच्या जागी पंजाबचा युवा सलामीवीर शुभमन गिलला संधी मिळाली. तसेच रविंद्र जाडेजा, रिषभ पंत यांचेही संघात पुनरागमन झाले. फॉर्मात असलेला फलंदाज लोकेश राहुलला मात्र दुसऱ्या कसोटीसाठीही भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे अनेकांनी भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली. भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांना राहुलला संधी न मिळाल्याचे आश्चर्य वाटले. ‘बॉक्सिंग-डे कसोटीत लोकेश राहुलला संघातून का वगळण्यात आले, हेच कळले नाही,’ असे श्रीकांत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.
Don’t get why @klrahul11 is dropped for the boxing test! #BoxingDayTest
— Kris Srikkanth (@KrisSrikkanth) December 25, 2020
राहुलला मागील काही कसोटी सामन्यांत चांगला खेळ करण्यात अपयश आले आहे. राहुलने सप्टेंबर २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत १४९ धावांची खेळी केली होती. त्यानंतरच्या १२ कसोटी डावांत मात्र राहुलला एकही अर्धशतक करता आले नाही. त्यामुळे त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले होते. यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही राहुलची भारतीय संघात निवड झाली नव्हती. राहुलने त्याचा अखेरचा कसोटी सामना ऑगस्ट २०१९ मध्ये खेळला आहे. मात्र, आयपीएल स्पर्धा, तसेच भारताकडून एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले. परंतु, त्याला अजून सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारताने पृथ्वी शॉच्या जागी राहुलऐवजी शुभमन गिलला संधी देण्याचा निर्णय घेतला.