महाराष्ट्राच्या मुले आणि मुली या दोन्ही संघांनी बुधवारी झालेले आपले अखेरचे साखळी सामने जिंकत ४७ व्या ज्युनियर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. तेलंगणा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ‘ह’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी पंजाबला ३८-३० असे पराभूत केले. या विजयासह महाराष्ट्राच्या मुलींनी ‘ह’ गटात अव्वल स्थान पटकावत बाद फेरी गाठली. मुलांच्या ‘इ’ गटात महाराष्ट्राने अखेरच्या साखळी सामन्यात तामिळनाडूवर ३८-२० अशी मात करत गटविजेते म्हणून बाद फेरीत प्रवेश केला. आता उप-उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या मुलांचा सिक्कीमशी, तर मुलींचा छत्तीसगडशी सामना होईल.
त्याआधी मंगळवारी रात्री महाराष्ट्राच्या मुलींनी विदर्भाला ६२-१२ असे नमवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली होती. महाराष्ट्राच्या मुलींनी त्यांचा चांगला खेळ सुरु ठेवत बुधवारी सकाळच्या सत्रात झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात पंजाबला ३८-३० असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या या दोन्ही विजयांमध्ये हरजित सिंग, मानसी रोडे, समृद्धी कोळेकर, कोमल ससाणे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
महाराष्ट्राच्या मुलांनी ‘इ’ गटात बुधवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात तामिळनाडूवर ३८-२० अशी मात केली. या सामन्यात मध्यंतराला महाराष्ट्राकडे २८-९ अशी आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या आकाश रुडाले, तेजस पाटील, शुभम पटारे, रोहित बिन्नीवाले, सुरेश जाधव यांनी चढाई-पकडीत उत्तम खेळ केला.