भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्व पक्षीय भूमिका घेणं गरजेचं आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत सीमाप्रश्नावर भाष्य केलं.
गेले काही महिने चीनसोबत चर्चा सुरु आहे. चर्चेची १३ वी फेरी झाली. चीनसोबत १३ वेळा घेतलेल्या बैठका यशस्वी झाल्या नाहीत. एका बाजून चीनशी चर्चा अयशस्वी होत आहे. तर दुसरीकडे पूँछ मध्ये दुसरी प्रतिक्रिया बघायला मिळत आहे. १३ वी फेरी अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सैनिकांवर हल्ला झाला. ५ जण शहीद झाले. हे सतत घडतंय हे चिंताजनक आहे, असं शरद पवार म्हणाले.
मी दिल्लीच्या अन्य पक्षातील सहकाऱ्यांशी बोलतोय. यामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याने एक सामूहिक भूमिका घेणं गरजेचं आहे. एक महिन्यापूर्वी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि एक के अँटनी यांन निमंत्रित केलं. भारत-चीन सीमेवर काय सुरु आहे, याची माहिती दिली. त्या बैठकीला लष्कर प्रमुख नरवणे हजर होते. साहजिकच त्या संपूर्ण माहिती मधून आम्ही एका गोष्टीच्या निष्कर्षावर आलो. राजकीय प्रश्नावर, अन्य प्रश्नावर आपला संघर्ष होऊ शकतो. पण या प्रश्नावर काहीही झालं तरी, राष्ट्रावर आघात करण्याचा प्रयत्न कुठून तरी होत असेल तर या ठिकाणी कशाही प्रकारचे मतभेद, राजकारण न आणता एका विचाराने संरक्षण खात्याच्या संदर्भात जी भूमिका घेतली जाईल त्याच्याशी संसंगत भूमिका आमची राहिल, हे आमचं वचन आहे, असं शरद पवार म्हणाले.
कालचा जो प्रकार आहे त्या दृष्टीने आणखीन थोडसं घट्ट एकत्र बसून पुढचा निर्णय घेण्याची आवश्यकता वाटते. म्हणून दिल्लीला गेल्यावर आणखीन काही सहकाऱ्यांशी बोलणार आहोत. इतरांशी फोनवर बोललो आहे. यातून सामूहिक भूमिका कशी घेता येईल. देशातील सर्व सामान्य लोकांना सुद्धा या संबंधित सतर्क कसं राहता येईल अशी भूमिका घ्यावी लागेल. याचा अर्थ भिती किंवा चिंता हे नव्हे. प्रश्न पुन्हा पुन्हा घडतोय त्यामुळे भूमिका घेणं गरजेचं आहे, असं शरद पवार म्हणाले.