नाशिक : इगतपुरी तालुक्यातील बोगस भरतीचा पदार्फाश झाल्यानंतर आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या आदिवासी आश्रमशाळेसाठी शिक्षक व शिक्षकेतर नोकर भरती करण्याचा घातलेला घाट उधळून लावला आहे. शिक्षण संस्थेने भरतीची जाहीरात प्रसिध्द केल्यानंतर, तालुक्यातील काँग्रेसचे नेते विनायक माळेकर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी संबंधित संस्थेची चौकशी केली असता बोगस भरतीचे बिंग फुटले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वटकपाडा येथे एका शिक्षण संस्थेने आदिवासी विभागाचा हवाला देत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्राथमिक व माध्यमिक महाविद्यालय आश्रमशाळा असल्याचा दावा करत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रीया सुरू केली. या भरती प्रक्रीयेसाठी एका दैनिकातून मुलाखतीसाठी जाहीरात प्रसिध्द केली. या पार्श्वभूमीवर, आदिवासी भागात मोठ्या संख्येने युवक व युवतींनी नोकरीच्या आशेने प्रयत्न सुरू केले. मुलाखतीला जाण्यासाठी अनेकांनी तयारीही सुरू केली.याबाबत, आदिवासी विभागाकडे चौकशी केली असता अशी मान्यता असलेली आश्रमशाळा नसल्याचे समोर आले. बोगसपणा उघड झाल्यानंतर ३० ऑक्टोंबर रोजी राबविली जाणारी मुलाखत प्रक्रीया संबंधित संस्थेने रद्द केली आहे. यामुळे तालुक्यातील बेरोजगारांची होणारी फसवणूक टळली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, माळेकर व बोडके यांनी आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांची भेट घेऊन सदर शिक्षणसंस्था व आश्रमशाळा याबाबत माहिती घेतली. तेव्हा खरी माहिती समोर आली. त्यानुसार दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली गेली.
भरतीला परवानगीच नाही
जाहिरात प्रसिद्धीनंतर माळेकर व बोडके यांनी संबंधित संस्थेचा पत्ता दिलेल्या गावात जाऊन माहिती घेतली असता, अशी संस्था व त्यांची आश्रमशाळा नसल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीला संस्थेचा बोर्ड लावून संस्था असल्याचे भासविले गेले. त्यानंतर माळेकर, बोडके यांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधत विचारणा केली.